ओतूर,प्रतिनिधी:दि.२८ जून [ रमेश तांबे ]
भिवंडी येथून ओतूर हद्दीतील खिरेश्वरगाव मार्गे हरिंशचंद्रगडावर ट्रेकसाठी आलेले शनिवारी दि.२७ रोजी रात्री ट्रेकर्सचे हे पथक वाट चुकल्याने ओतूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रात्री अंधारात शोध घेऊन,त्यांची सुटका करून त्यांना,त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती देताना श्री बाजगीरे म्हणाले की,भिवंडी येथून चार मुले व तीन मुली हे शनिवार दि.२७ रोजी सकाळी ११ वाजता खिरेश्वरगाव मार्गे हरिंशचंद्र गडावर ट्रेकीगसाठी आले होते.दरम्यान ट्रेकिंग करून परतत असताना, रिमझीम पाऊस व धुक्यामुळे ते वाट चुकले गडावर मोबाईलची रेंज नसल्याने ते इतरत्र भरकटले.या पर्यटकांनी वाट चुकल्याने त्यांनी रात्री नऊ वाजता महाराष्ट्र शासनाच्या टोल-फ्री आपत्कालीन हेल्पलाईन टोल – फ्री क्रमांक ११२ ला कॉल केला.ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे दोन पोलीस अंमलदार व दोन होमगार्ड सरकारी गाडीने बँटरी ,रेनकोटसह रवाना करण्यात आले.
परंतु रेंज नसल्याने त्यांना संपर्क होत नव्हता. तेंव्हा स्थानिक गावकरी व पोलीस मित्र यांचे मदतीने त्यांचा शोध सुरू केला,तेव्हा रात्री साडेबारा वाजता सदर मुले व मुली भयभित स्थितीत परंतु सुखरूप मिळून आली .त्यांना त्यांचे नातेवाईक यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल,अपर पोलीस अधिक्षक शुभमकुमार,जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे,पोलीस उपनिरिक्षक संदिप आमणे,पोलीस शिपाई ज्योतीराम पवार,शामसुंदर जायभाये,मनोज राठोड,होमगार्ड संदिप शिंदे,काळे, मोमीन,पोलीस मित्र व तंटामुक्ती अध्यक्ष मारुती मेमाणे, बाळ पंडित, गौरव मेमाणे यांनी यशस्वी रेस्कु केले.




