अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने मोठी मोहीम राबवत एका दिवसात तब्बल ३२ बालविवाह थांबवले. ही माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार अल्पवयीन मुलगा-मुलींचा विवाह करणे हा गुन्हा आहे. तरीही काही भागांमध्ये विशेषतः अक्षय तृतीयेच्या दिवशी पारंपरिक कारणांमुळे अशा घटना घडतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने ‘बाल विवाह मुक्त भारत’ या मोहिमेअंतर्गत व्यापक जनजागृती आणि कडक अंमलबजावणी केली आहे. या विशेष कारवाईत विविध विभागांतून बालविवाह रोखण्यात आले. यात रायगड, पालघर, नाशिक, बीड, यवतमाळ, चंद्रपूर यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे.
या मोहिमेत केवळ विवाह रोखण्यावरच भर नसून, संबंधित मुलींचे पुनर्वसन, शिक्षण, समुपदेशन आणि संरक्षण यावरही लक्ष दिले जात आहे. तसेच, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पालक आणि मध्यस्थांवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, या अभियानाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी UNICEF च्या सहकार्याने राज्यस्तरीय कार्यशाळाही आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी, तज्ज्ञ आणि विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. राज्य सरकारकडून पुढेही अशा घटनांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.




