महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ज्याने महापुरुष आणि लोकशाही मूल्यांवर आधारित नावे देऊन सामाजिक ऐक्याला चालना दिली
कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याने एक अभूतपूर्व पाऊल उचलत महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणून जातीवाचक नावे असलेल्या वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एकूण 192 वस्त्या आणि 25 रस्त्यांची नावे, जसे की “हरिजन वाडी”, “चर्मकार वाडी” आणि “बौद्ध वाडी”, आता थोर महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी निगडित नव्या नावांनी ओळखली जाणार आहेत. पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे सामाजिक सलोख्याला बळकटी मिळणार आहे.
हा निर्णय जुलै महिन्यात अनुसूचित जातींसाठी आयोजित समाज संवाद आणि तक्रार निवारण जनता दरबारात उपस्थित केलेल्या सामूहिक मागणीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला. यावेळी जातीवाचक नावांचा मुद्दा पालकमंत्री राणे यांच्यासमोर मांडण्यात आला होता. त्यानंतर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने ही नावे बदलून महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित नावे देण्याचा निर्णय घेतला. यासाठी ग्रामसभांमधून ठराव मंजूर करून 192 जातीवाचक वस्त्या आणि 25 रस्त्यांची नावे बदलण्याचे प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले.या प्रस्तावांवर शासनाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ग्रामसभा ठरावांद्वारे सुचवलेली नवीन नावे स्वीकारत 192 वस्त्या आणि 25 रस्त्यांची जुनी जातीवाचक नावे बदलली. हा निर्णय शहरी आणि ग्रामीण भागातील सामाजिक ऐक्याला चालना देणारा ठरेल आणि इतर जिल्ह्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल.




