ठाणे येथील घोडबंदर रोडवरील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून उभारल्या जाणाऱ्या ठाणे–बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. मंगळवारी (7 एप्रिल) बोरिंग मशीनच्या साहाय्याने या बोगद्याच्या खोदकामाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. हा प्रकल्प MMRDA च्या माध्यमातून राबवला जात असून 2028 पर्यंत तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दररोज सुमारे 1 लाख वाहने या बोगद्यातून प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या मार्गामुळे सध्या दीड ते दोन तास लागणारा बोरिवली ते ठाणे प्रवास केवळ 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या बोगद्याच्या खोदकामासाठी TBM (Tunnel Boring Machine) तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून “नायक” आणि “अर्जुना” या दोन मशीनच्या मदतीने काम पार पडणार आहे. या मशीनची नावे संजय गांधी नॅशनल पार्क येथील जैवविविधतेवर आधारित ठेवण्यात आली आहेत. “नायक” हे नाव पार्कमधील एका फुलपाखरावरून, तर “अर्जुना” हे नाव तेथील एका प्राचीन वृक्षावरून देण्यात आले आहे.
महायुती सरकारचा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी मानला जात असून, पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




