आदित्य धरच्या सिनेमॅटिक मॅजिकने रचला इतिहास; विराट-अनुष्काकडून चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव
भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे अभिनेता रणवीर सिंह आणि दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर : द रिव्हेंज’. १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड्सच मोडले नाहीत, तर प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं आहे. ४ तासांचा हा महाप्रचंड चित्रपट असूनही, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात तो यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाच्या यशात आता क्रीडाविश्वातील दिग्गज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रतिक्रियेची खास भर पडली आहे.
विराट कोहलीने हा चित्रपट पाहिल्यानंतर आपली भावना सोशल मीडियावर व्यक्त करताना म्हटलं की, भारतात असा सिनेमॅटिक अनुभव त्याने यापूर्वी कधीच घेतला नव्हता. विराटने पोस्टमध्ये लिहिलं “आज मी हा चित्रपट पाहिला आणि खात्रीने सांगू शकतो की, असा अनुभव मला भारतात पहिल्यांदाच मिळाला आहे. या चित्रपटाने माझ्या प्रत्येक भावनेला स्पर्श केला. तब्बल ४ तास मी माझ्या जागेवरून हललो नाही.”
विराटने पुढे दिग्दर्शक आदित्य धर यांच्या प्रतिभेला ‘सलाम’ केला असून रणवीर सिंहच्या अभिनयाबद्दल “तू एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहेस,” अशा शब्दांत गौरव केला आहे.
विराटसोबतच अनुष्का शर्मानेही या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तिने रणवीरच्या करिअरमधील हा सर्वोत्कृष्ट अभिनय असल्याचं म्हटलं. अनुष्काने केवळ रणवीरच नाही, तर आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि राकेश बेदी यांच्या कामाचंही विशेष कौतुक केलं. आदित्य धरच्या दिग्दर्शकीय कौशल्याबद्दल बोलताना तिने त्याला एक ‘ओरिजिनल आणि विश्वासू’ फिल्ममेकर म्हटलं आहे.
चित्रपटाने जगभरात ₹१६०० कोटींहून अधिक कमाई करून नवा इतिहास रचला आहे. ‘बाहुबली २’ सारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढत हा चित्रपट २०२६ मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. रणवीर सिंहसोबतच संजय दत्त, आर. माधवन आणि अक्षय खन्ना यांच्या जुगलबंदीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. थोडक्यात सांगायचं तर, ‘धुरंधर २’ ने बॉलिवूडला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं असून, रणवीर सिंह आता जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहे.




