MRVC ने अवघ्या चार महिन्यांत पूर्ण केले आव्हानात्मक काम; ‘ट्रायल रन’ यशस्वी झाल्याने प्रवाशांचा प्रवास होणार सुसाट
पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) विरार स्थानकात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. १५ डब्यांच्या लोकल गाड्या चालवण्यासाठी आवश्यक असलेली फलाटांची लांबी आणि रुंदी वाढवण्याचे काम रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण झाले असून, आज या नव्या ट्रॅकवर लोकलची यशस्वी चाचणी (Trial Run) घेण्यात आली. विशेष म्हणजे, नेहमीची रेल्वे वाहतूक विस्कळीत न होऊ देता अत्यंत नियोजित पद्धतीने हे काम मार्गी लावण्यात आले आहे, ज्यामुळे आता विरार-डहाणू मार्गावरील प्रवासी क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
या प्रकल्पामुळे विरार स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ए आणि ४ए ची रुंदी ६.५० मीटरवरून थेट १०.५० मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर पश्चिमेला ‘५ए’ हा नवा होम प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना फलाटावर वावरणे अधिक सोपे होणार असून चेंगराचेंगरीची भीती कमी होईल. एमआरव्हीसीचे सीएमडी विलास एस. वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम लवकरच पश्चिम रेल्वेच्या सुपूर्द केले जाणार आहे. या पायाभूत सुविधेमुळे उपनगरीय रेल्वे सेवा अधिक सुरक्षित आणि वेगवान होण्यास मोठी मदत मिळणार आहे.
विरार स्थानकातील फलाटांच्या विस्तारीकरणामुळे आता १५ डब्यांच्या लोकलचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर रेल्वेने प्रवाशांना दिलेला हा एक मोठा ‘बोनस’ मानला जात आहे.




