धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय उपोषण मागे घेतल्याबद्दल स्पष्टीकरण देताना, सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांचे हित आणि संसदेत चर्चेच्या आश्वासनामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे
नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात जंतर-मंतरवर २६ दिवस बेमुदत उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. मध्यरात्री केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या भेटीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण न झाल्याने निर्माण झालेल्या प्रश्नांवर वांगचुक यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजीनामा कधी दिला जाईल याचे कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसले, तरी हजारो लोकांच्या आग्रहास्तव आणि स्वतःचा संघर्ष सुरू ठेवण्यासाठी जिवंत राहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारने मान्य केलेल्या प्रमुख अटींची माहिती देताना वांगचुक यांनी स्पष्ट केले की, २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी मागणी होती. लडाखमधील अनुभवाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांवर दाखल होणारे एफआयआर त्यांचे संपूर्ण भविष्य उद्ध्वस्त करू शकतात. तसेच, नीट पेपरफुटीमुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई दिली जाईल आणि शिक्षण प्रणालीतील सुधारणांवर आगामी संसदेत सविस्तर चर्चा केली जाईल, असे आश्वासन सरकारकडून मिळाले आहे.
एकीकडे सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण सोडले असले, तरी ‘कॉकरोच जनता पार्टी’ अजूनही आपल्या भूमिकेवर कायम आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा या पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी घेतला आहे. मंत्र्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नसला, तरी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे आणि संसदेत चर्चेची हमी मिळणे यामुळे या आंदोलनाला एक नवे वळण मिळाले आहे.




