इतिहासात पहिल्यांदाच भारताने १२ अणवस्त्रे ठेवली तैनात; मिसाईलच्या ‘कॅनिस्टरायझेशन’ तंत्रज्ञानामुळे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे धाबे दणाणले
जागतिक शस्त्रास्त्रांवर आणि प्रामुख्याने अणवस्त्रांवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ (SIPRI) या नामांकित संस्थेच्या ताज्या अहवालाने दक्षिण आशियातील लष्करी रणनीतीमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. या रिपोर्टनुसार, भारताने आपल्या अणवस्त्र धोरणात मोठा बदल केला असून, इतिहासात पहिल्यांदाच अणवस्त्रे केवळ साठवून (स्टॉकपाइल) ठेवण्याऐवजी थेट ‘ऑपरेशनल मोड’मध्ये म्हणजेच सक्रिय युद्ध पातळीवर तैनात केली आहेत. ही माहिती समोर येताच शेजारील देश पाकिस्तानच्या गोटात कमालीची घबराट पसरली असून, तिथल्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताची अणवस्त्र क्षमता ही आंतरराष्ट्रीय अंदाजांपेक्षा कित्येक पटीने अधिक घातक आणि संहारक असल्याचे जाहीरपणे मान्य केले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी अधिकृत प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, ते भारताच्या या बदलत्या अणवस्त्र भूमिकेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. पाकिस्तानला सर्वात जास्त काळजी भारताच्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या ‘कॅनिस्टरायझेशन’ (Canisterisation) तंत्रज्ञानाची वाटत आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाअंतर्गत अणवस्त्रांना आधीपासूनच क्षेपणास्त्राच्या आत पूर्णपणे सील करून ठेवले जाते, ज्यामुळे प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगी अत्यंत कमी वेळात ही अणकुचीदार क्षेपणास्त्रे डागणे भारताला शक्य होणार आहे. याशिवाय, समुद्र, जमीन आणि हवेतून एकाच वेळी अणूहल्ला करण्याची भारताची ‘न्यूक्लियर ट्रायड’ क्षमता, लांब पल्ल्याची इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) प्रणाली आणि अणवस्त्रधारी पाणबुड्यांच्या विस्तारामुळे पाकिस्तान स्वतःच्या सुरक्षेला मोठा धोका असल्याचे मानत आहे.
‘सिपरी’च्या अहवालानुसार, भारताकडे सध्या एकूण १९० अणवस्त्रे असून त्यापैकी १२ वॉरहेड्स हे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज स्थितीत तैनात ठेवण्यात आले आहेत. पहिल्यांदाच एखाद्या जागतिक सुरक्षा संस्थेने भारताची अणवस्त्रे ही नुसता साठा नसून ती ‘सक्रिय तैनात’ असल्याचे आपल्या नोंदणीत म्हटले आहे. या वाढत्या ‘ऑपरेशनल रेडीनेस’मुळे (युद्ध सज्जता) धास्तावलेल्या पाकिस्तानने आता जागतिक पातळीवरील श्रीमंत आणि शक्तिशाली देशांकडे विनवणी सुरू केली आहे. भारताची वाढती लष्करी ताकद रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान आणि आधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा तात्काळ थांबवावा, अशी हतबल मागणी पाकिस्तानने केली आहे.




