“चांगल्या माणसाची कदर नाही…”, नेटकऱ्यांचा संताप; सचिनच्या एक्झिटनंतर सोशल मीडियावर चाहत्यांची रडारड
रितेश देशमुख यांचा लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस मराठी ६’ सध्या एका महत्त्वाच्या वळणावर आहे. घरात दररोज नवनवे राडे आणि समीकरणं पाहायला मिळत असतानाच, प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक आणि ‘खान्देश किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेला सचिन कुमावत घराबाहेर पडला आहे. शोच्या सहाव्या आठवड्यात सचिनचा प्रवास संपल्याने त्याचे चाहते कमालीचे नाराज झाले आहेत.
बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच सचिनने इन्स्टाग्रामवर एक मनाला भिडणारी पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले “बिग बॉस मराठीच्या घरात जाणं अनेकांचं स्वप्न असतं. खान्देशातला एक कलाकार ते बिग बॉस मराठी इथपर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी खूप खास होता. एक कलाकार म्हणून ६ आठवड्यांपेक्षा जास्त काळ मी तिथे टिकू शकलो, तेही कोणाचाही द्वेष न करता आणि प्रामाणिकपणे खेळून! तुमच्या या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद.”
सचिन कुमावत हा घरातील सर्वात शांत आणि संयमी स्पर्धक मानला जात होता. त्याच्या अचानक जाण्याने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. सचिनच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत असून चाहते म्हणत आहेत “चांगली माणसं नेहमी खटकतात आणि त्यांची कदर उशिरा कळते.” “सचिन, तू होतास म्हणून बिग बॉस पाहायचो, आता आम्ही हा शो बघणं बंद करणार!” “खऱ्या आणि चांगल्या माणसाला खेळाबाहेर काढलं, हे चुकीचं आहे.”
रितेश देशमुखनेही सचिनच्या साधेपणाचं कौतुक केलं होतं. मात्र, बिग बॉसच्या घरात टिकण्यासाठी आवश्यक असणारी ‘कट-कारस्थानं’ आणि ‘गेम प्लॅनिंग’मध्ये सचिन कुठेतरी कमी पडला, असं बोललं जात आहे. आता या प्रवासानंतर सचिन नेमका कोणत्या नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार, याकडे त्याच्या खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे.




