ज्येष्ठ आणि सर्वांच्या मनात घर करून राहिलेल्या अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra)यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. मुंबईतील घरामध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत, वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी शांतपणे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेकांना असे वाटत आहे की हिंदी चित्रपटसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा पडदा खाली आला आहे.
दोन दिवसांपूर्वी देओल परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. याचदरम्यान हेमामालिनी यांनीही त्यांच्या निवासस्थानी स्वतंत्र प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. येथे भजन, भगवद्गीतेचे पठण आणि शांत वातावरणाने सर्वांना भारावून टाकले.
या सभेला अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा हेदेखील उपस्थित होत्या. त्या सभेत प्रवेश करताच, भजनांचा स्वर आणि वातावरणातील भावनिक भार पाहून त्या अश्रूंना आवरू शकल्या नाहीत. हेमामालिनींसमोर त्या क्षणभर स्थिर राहिल्या आणि त्या वेदनेने ओथंबून आल्या.
हेमामालिनींच्या स्थितीबद्दल विचारले असता सुनीता (Sunita) म्हणाल्या, “हे नुकसान शब्दात सांगता येणार नाही. धरमजी महान व्यक्ती होते. त्यांच्या कुटुंबाचा मला मनापासून आदर आहे. ते माझे बालपणीचे क्रश होते. त्यांच्या जाण्यामुळे मी खूप व्यथित आहे.”
धर्मेंद्र यांच्यासोबतच्या आठवणी जागवत सुनीता म्हणाल्या की, त्यांना सोनी टीव्हीवरील ‘छलकाए जाम’ कार्यक्रमात धर्मेंद्रसोबत स्टेज शेअर करण्याचा सन्मान मिळाला होता. ईशा देओलशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले. मजेत त्या म्हणाल्या, “गोविंदाशी मी लग्न केले त्याचं कारण म्हणजे तो मला थोडाफार धर्मेंद्रसारखा दिसत होता! धरमजी इतके देखणे होते की इंडस्ट्रीत त्यांच्यासारखा कोणीच नाही.” फक्त दोन महिन्यांपूर्वी गणेशोत्सवाच्या वेळी धर्मेंद्र यांची त्यांची शेवटची भेट झाली होती, असेही त्यांनी सांगितले.




