भंडाऱ्यातील सभेत पटेलांची बेधडक टीका, बिहार–बंगाल निकालांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि राष्ट्रवादीच्या रणनीतीवर भाष्य
भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना मतदानासाठी ऊर्जितावस्था तयार करण्याचा सल्ला देत, “घरी बसून कोणीही मत देणार नाही. वातावरण तयार करा,” असा जोरदार संदेश दिला.
यावेळी त्यांनी कोणाचे नाव न घेता, “स्वतःला बाहुबली समजणाऱ्यांना आम्ही आधीच अनेक वेळा हरवले आहे. पैशांच्या जोरावर जिंकता येत नाही,” असे म्हणत आपल्या पक्षाची स्वतंत्र ओळख अधिक ठाम असल्याचा दावा केला. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता, यावर आता राज्यभर चर्चा रंगली आहे.
बिहार निवडणुकांवरून बचावात्मक भूमिका
बिहार निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने १६ उमेदवार दिले, मात्र सर्वांची जप्ती झाली. यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले की “ही स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा होती, पक्षाने कुठेही दबाव तयार केला नव्हता. आम्ही प्रचारालाही गेलो नाही.” पटेलांनी स्पष्ट केलं की पक्षाच्या उच्च पातळीवरून बिहारकडे विशेष लक्ष देण्यात आले नव्हते.
बंगालवर भाजपचा फोकस
बिहारनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष्य पश्चिम बंगाल असल्याचं पटेलांनी सांगितलं. “गंगा बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये मिळते— पंतप्रधानांचा हा संदेश स्पष्ट आहे. बंगालमध्येही भाजप उत्तम कामगिरी करेल आणि सरकार बनण्याचीही शक्यता आहे,” असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर राष्ट्रवादीची रणनीती
पटेलांनी सांगितलं की महायुतीचे तीनही पक्ष अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. “लोकल लेव्हलवर परिस्थिती बदलते. तिथला निर्णय तिथेच घ्यावा लागतो. भंडारा–गोंदिया जिल्ह्यात आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एखाद्या ठिकाणी तडजोड आवश्यक वाटल्यास तीही करू,” अशी माहिती त्यांनी दिली.




