ऑफिसमधील चहाची वेळ असो, रेल्वे स्टेशनवरील धावपळ किंवा रस्त्याच्या कडेला असलेली टपरी — बहुतांश ठिकाणी चहा आणि कॉफी पेपर कपमध्ये दिली जाते. प्लास्टिकच्या तुलनेत पेपर कप सुरक्षित असल्याचा समज अनेकांमध्ये आहे. मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरम पेयांसाठी वापरले जाणारे हे कप शरीरासाठी पूर्णपणे सुरक्षित नसून त्यातून काही हानिकारक घटक पेयामध्ये मिसळू शकतात.
बहुतांश पेपर कप हे फक्त कागदाचे बनलेले नसतात. कपच्या आतील बाजूला पातळ प्लास्टिक किंवा मेणाचा थर दिलेला असतो, ज्यामुळे गरम पेयामुळे कप लगेच खराब होत नाही. मात्र गरम चहा किंवा कॉफी ओतल्यानंतर या थरातून सूक्ष्म प्लास्टिक कण आणि रसायने पेयामध्ये मिसळण्याची शक्यता वाढते.
तज्ज्ञांच्या मते, या मायक्रोप्लास्टिक्सचा दीर्घकाळ शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पचनसंस्था, हार्मोन्स आणि शरीरातील इतर अवयवांवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. वारंवार अशा कपांमध्ये गरम पेय घेतल्यास पोटाच्या समस्या, हार्मोनल असंतुलन आणि इतर आरोग्यविषयक त्रास उद्भवू शकतात.
याशिवाय पेपर कप पर्यावरणासाठीही मोठे आव्हान ठरत आहेत. प्लास्टिक कोटिंगमुळे हे कप सहज पुनर्वापरासाठी प्रक्रिया करता येत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा वाढून पर्यावरणावर ताण निर्माण होतो.
आरोग्य तज्ज्ञांनी शक्यतो स्टील, काच किंवा मातीच्या कपांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सतत पेपर कपमध्ये गरम चहा किंवा कॉफी घेणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. अधूनमधून वापरामुळे मोठा धोका नसला तरी रोजच्या सवयीमुळे भविष्यात आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे वेळेत सावध होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.




