मुंबईतील पायधूनी परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. एका कुटुंबातील चार सदस्यांचा संशयित अन्नविषबाधेमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मृतांमध्ये आई-वडील आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबाने आपल्या नातेवाईकांसोबत जेवण केले होते. जेवणानंतर त्यांनी बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याचे समजते. काही वेळातच कुटुंबातील सर्वांना अचानक उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने त्यांना तातडीनेजे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले.
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच एका मुलीला मृत घोषित केले. त्यानंतर अल्पावधीतच दुसऱ्या मुलीचा, आणि पुढे आई-वडिलांचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांनाही धक्का बसला आहे. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी अधिकृत निष्कर्षासाठी वैद्यकीय तपासणीची प्रतीक्षा आहे. संबंधित नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे अचूक कारण समोर येणार आहे.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, अन्नाचा स्रोत, त्याची गुणवत्ता आणि इतर शक्य कारणांचा शोध घेतला जात आहे. ही घटना अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे.




