केमिकल युक्त कोल्हापुरी गुळामुळे सध्या गूळ उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची, हा प्रश्न अधिक तीव्र झाला असून त्याचा थेट परिणाम कोल्हापूरमधील गुळ बाजारावर होत आहे.
जिल्ह्यातील अनेक गुऱ्हाळे आधीच बंद आहेत, तर काही ठिकाणी सुरू असलेल्या उत्पादनालाही आता ब्रेक लागणार आहे. गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी आजपासून गुळनिर्मिती थांबवण्याचा निर्णय घेतला असून, केमिकलयुक्त गुळाबाबत व्यापाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासात कोल्हापूरहून पाठवलेल्या गुळामध्ये घातक रसायने आढळली होती. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर गुजरातमधील व्यापाऱ्यांनी कोल्हापूर आणि सांगली येथील गुळ खरेदी करण्यास नकार दिला आहे.
या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर बाजारातही शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी या प्रकरणासाठी व्यापाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर टीका केली आहे.
संपूर्ण प्रकरणामुळे गुळ उद्योगावर मोठा परिणाम होत असून, पुढील काळात या वादावर तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे




