नवोदितांचा फ्लॉप शो आणि फोल ठरलेली रणनीती; वर्ल्ड कपमधील भारताचा प्रवास आता धोक्यात?
आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये विजयरथावर स्वार असलेल्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेने जमिनीवर आणले आहे. सुपर-८ फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताला ७६ धावांच्या मोठ्या फरकाने मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ माजली असून कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील वादाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना १८७ धावांचे तगडे आव्हान भारतासमोर ठेवले होते. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली. इशान किशन, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांसारख्या युवा खेळाडूंनी आफ्रिकन गोलंदाजांसमोर नांगी टाकली. पावरप्लेमध्येच ३ विकेट्स गमावल्यामुळे भारतावर प्रचंड दडपण आले. गौतम गंभीरने आखलेला गेमप्लॅन या सामन्यात सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. केवळ शिवम दुबेने एकाकी झुंज दिली, मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणाचीही साथ मिळाली नाही. शेवटी संपूर्ण भारतीय संघ १११ धावांवर गारद झाला.
सामना संपल्यानंतर डगआऊटमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव कमालीचा संतप्त आणि चिंतेत दिसला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सूर्या सपोर्ट स्टाफ आणि गौतम गंभीर यांच्यासोबत तीव्र शब्दात चर्चा करताना दिसत आहे. या संभाषणाचे रूपांतर वादात झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे. रणनीतीमधील त्रुटी आणि खेळाडूंच्या ‘कॅज्युअल’ वृत्तीवर सूर्याने जाहीर नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
या पराभवामुळे भारताचे नेट रनरेट खालावले असून आता सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. २६ फेब्रुवारी २०२६ भारत विरुद्ध झिम्बाब्वे तर १ मार्च २०२६ भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना होणार आहे.




