इन्स्टाग्रामवर संयुक्त निवेदन; माहीच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांत चर्चा
टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडी जय भानुशाली आणि माही विज यांनी लग्नाच्या १४ वर्षांनंतर परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रविवारी दोघांनीही इन्स्टाग्राम स्टोरीवर एकत्र पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यातील दुराव्याच्या चर्चा सुरू होत्या, ज्यावर अखेर अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे.
घटस्फोट जाहीर केल्यानंतर काही तासांतच माही विजने इन्स्टाग्रामवर काही भावनिक आशयाच्या पोस्ट शेअर केल्या. “तुम्ही लोकांसाठी जितकं करता, तितकंच लोक तुमच्यासाठी करतील अशी अपेक्षा ठेवली, तर निराशाच पदरी पडते,” असा संदेश तिने दिला. तर दुसऱ्या पोस्टमध्ये, “लोकांना चांगुलपणा, प्रेमळ हृदय आणि सकारात्मक ऊर्जेवर विश्वास ठेवायला भाग पाडणारं कारण तुम्ही बना,” असं तिने लिहिलं. या पोस्ट्स जयवर अप्रत्यक्ष टोमणा आहेत का, असा सवाल नेटकरी करत आहेत.
जय आणि माही यांनी २०११ साली विवाह केला होता. त्यांना तारा ही मुलगी असून राजवीर आणि खुशी या दोन मुलांना त्यांनी दत्तक घेतलं आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि तेव्हापासून ते वेगवेगळे राहत होते.
संयुक्त निवेदनात त्यांनी स्पष्ट केलं की, आयुष्याच्या या टप्प्यावर विभक्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी एकमेकांप्रती आदर, मैत्री आणि सहकार्य कायम राहील. विशेषतः मुलांसाठी ते सर्वोत्तम पालक आणि मित्र म्हणून आपली जबाबदारी पार पाडतील, असं त्यांनी ठामपणे नमूद केलं.
तसंच, या निर्णयामागे कोणताही खलनायक नाही किंवा नकारात्मकता नाही, असं सांगत त्यांनी चाहत्यांना निष्कर्ष काढू नये, अशी विनंती केली आहे. ड्रामापेक्षा शांतता आणि समंजसपणाला प्राधान्य देत, पुढील वाटचालीसाठी त्यांनी सर्वांकडून आदर, प्रेम आणि दयाळूपणाची अपेक्षा व्यक्त केली आहे.




