रक्ताभिसरण सुधारून ताण कमी करणारी ही जुनी पण प्रभावी घरगुती पद्धत आजही आरोग्यासाठी वरदान ठरते
दिवसभराच्या धावपळीनंतर थकलेल्या पायांना कोमट पाण्यात भिजवणे हा सहज वाटणारा उपाय असला तरी त्याचे परिणाम अत्यंत लाभदायक ठरतात. पूर्वीपासूनच लोक हा उपाय रोजच्या थकव्यावर उपाय म्हणून वापरत आले आहेत. दिवसभर शरीराचे ओझे वाहणारे पाय दिवसाच्या शेवटी थोड्या उबदार पाण्यामुळे केवळ हलकेच वाटत नाहीत, तर संपूर्ण शरीराला शांतता मिळते.
ही साधी पद्धत रक्तप्रवाह सुधारण्यात, ताण कमी करण्यात आणि पायातील वेदना शांत करण्यात मदत करते. पाण्याच्या उबेमुळे तापमान वाढते आणि त्यामुळे नसांमधील ताण कमी होऊन आराम जाणवतो. दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्यांसाठी ही नैसर्गिक थेरेपी अत्यंत उपयुक्त आहे. सुज, वेदना किंवा थकवा कोमट पाणी या सर्वांवर प्रभावी ठरते.
मानसिक ताणही कमी होतो, कारण पायांना मिळणारा आराम शरीरभर सकारात्मक परिणाम घडवतो. हिवाळ्यात ज्यांचे पाय नेहमी थंड पडतात, त्यांच्यासाठी हा उपाय विशेषतः उपयोगी ठरतो. पाण्यात मीठ घातल्यास त्यातील खनिजे सूज, जळजळ आणि दुर्गंधी कमी करण्यात मदत करतात. एप्सम किंवा सिंधव मीठ यासाठी उत्तम मानले जाते.
याचबरोबर, गरम पाण्यात पाय ठेवणे हा ताप कमी करण्याचा पारंपरिक उपायही आजही तितकाच प्रभावी आहे. पायातील नाड्या सक्रिय होऊन शरीरातील अतिरिक्त उष्णता खाली खेचली जाते, त्यामुळे डोक्यातील ताप कमी होतो. कपाळावर थंड पट्टी आणि खाली गरम पाण्याचा वापर हा तापावरचा खास उपयुक्त फॉर्म्युला मानला जातो.




