अंबरनाथ परिसरात प्रेमसंबंधाच्या संशयातून झालेल्या अमानुष मारहाणीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 23 जून रोजी घडलेल्या या प्रकरणात जखमी झालेल्या ओम खोरे या तरुणाचा मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींविरोधातील गुन्ह्यात हत्येचे कलम जोडण्याची तयारी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ओमचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या काका संदीप गवळी याला होता. या संशयातून संदीप गवळी आणि त्याच्या साथीदारांनी ओमचे कथित अपहरण करून त्याला एका मैदानात नेले आणि लोखंडी रॉड, बांबू तसेच धारदार शस्त्रांनी गंभीर मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांनी संदीप गवळी आणि रवी परमार यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, अंबरनाथमध्येच आणखी एका घटनेत वकील सतीश गायकवाड यांच्यावर त्यांच्या कार्यालयात घुसून हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. कार्यालयासमोर गोंधळ घालणाऱ्या काही तरुणांना समज दिल्याचा राग मनात धरून संबंधितांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या हल्ल्यात मारहाणीसोबतच जीवे मारण्याची धमकी आणि कार्यालयातील रोकड चोरीचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय, उल्हासनगर परिसरात किरकोळ वाहनधडकेनंतर दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन त्याचे हिंसक रूपांतर झाल्याची घटना समोर आली आहे. बुलेट आणि दुचाकीच्या धडकेनंतर संतप्त झालेल्या काही जणांनी एका तरुणाला घेरून बेदम मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. या सलग घडलेल्या घटनांमुळे अंबरनाथ आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून सर्व प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे.




