जळगाव जिल्ह्यातील वडनगरी परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, मजुरीसाठी घराबाहेर पडलेल्या एका शेतकऱ्याचा गिरणा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांच्यासोबत असलेले दोन बैलही पाण्यात बुडाल्याने मृत्युमुखी पडले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत शेतकऱ्याचे नाव दिलीप कल्याणकरr (वय ५५) असे असून, ते वडनगरी गावचे रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप कल्याणकर हे दररोजप्रमाणे आपल्या सहकारी चिंतामण नाईक यांच्यासोबत मजुरीसाठी खेडी भोकर शिवारातील शेतात जात होते. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ते बैलगाडीतून गिरणा नदीचे पात्र ओलांडत होते. नदीपात्रातील पाण्याचा अंदाज घेत असताना अचानक खोल खड्डा आल्याने बैलगाडीचा तोल गेला आणि गाडी पाण्यात उलटली.
घटना घडताच चिंतामण नाईक यांनी प्रसंगावधान राखत पाण्यात उडी घेतली आणि स्वतःचा जीव वाचवला. मात्र दिलीप कल्याणकर यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. बैलगाडीसह ते खोल पाण्यात अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. गाडीला जुंपलेले दोन बैलही पाण्याच्या प्रवाहात अडकले आणि त्यांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी बचावकार्य सुरू करत सुमारे तीन तास प्रयत्न केले. अखेर नदीपात्रातून दिलीप कल्याणकर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह बाहेर आल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. एका मेहनती आणि साध्या शेतकऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने वडनगरी गावावर शोककळा पसरली आहे.




