मध्यपूर्वेत इराण-इस्रायल संघर्षाने ऊर्जा संकट गडद; दुसरीकडे रुपपूर प्रकल्पात इंधन भरण्यास सुरुवात करत बांगलादेशची ऐतिहासिक झेप
जगाच्या एका टोकाला इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे ऊर्जा संकट निर्माण झाले असताना, शेजारील देश बांगलादेशने मात्र प्रगतीचे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. २८ फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात इराणचे अतोनात नुकसान झाले असून ‘स्ट्रेट ऑफ होर्मूज’ बंद असल्याने कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. अशा भीषण जागतिक तणावाच्या परिस्थितीत, बांगलादेशने मंगळवारी आपल्या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पात इंधन भरण्याची प्रक्रिया यशस्वीपणे सुरू केली आहे. रशियाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या रुपपूर अणूऊर्जा प्रकल्पातील ‘VVER-1200’ या अद्ययावत अणुभट्टीमुळे आता बांगलादेशच्या ऊर्जा क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात झाली आहे.
ढाकापासून १६० किलोमीटर अंतरावर असलेल्या या प्रकल्पाची एकूण क्षमता २.४ गिगावॅट इतकी असून, याद्वारे बांगलादेशच्या एकूण विजेच्या गरजेपैकी १० ते १२ टक्के वाटा उचलला जाणार आहे. विशेष म्हणजे, रशियाच्या ज्या ‘प्रेशराईज्ड वॉटर रिअॅक्टर’ तंत्रज्ञानाचा वापर येथे केला जात आहे, त्याच तंत्रज्ञानासाठी भारत देखील आपल्या कुडनकुलम प्रकल्पासाठी उत्सुक आहे. बांगलादेशने हे स्पष्ट केले आहे की, या अणुऊर्जेचा वापर केवळ शांततापूर्ण मार्गानं वीजनिर्मितीसाठीच केला जाईल, शस्त्रास्त्र निर्मितीसाठी नाही. २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची शक्यता असून, जागतिक ऊर्जा अस्थिरतेच्या काळात बांगलादेशने स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.




