Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा ‘डबल अटॅक’; एका बाजूला ४१ अंशांची लाट, तर दुसरीकडे अवकाळीचा तडाखा!

spot_img

अकोल्यात पारा ४१ पार तर पुणे-विदर्भात पावसाचा ‘येलो अलर्ट’; शेतीकामांची दाणादाण आणि नागरिकांचे हाल

महाराष्ट्रात सध्या हवामानाचा विचित्र लपंडाव पाहायला मिळत असून, जनता एकाच वेळी कडक ऊन आणि अनपेक्षित पावसाचा सामना करत आहे. विदर्भातील अकोल्यात तापमानाने ४१ अंशांचा टप्पा ओलांडला असून परभणी, वर्धा आणि अमरावतीमध्येही पारा ४० च्या पार गेला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून, हवामान विभागाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. सोलापूर आणि वाशिममध्येही उष्णतेची तीव्रता वाढली असून, आगामी काही दिवस हीच स्थिती राहण्याचे संकेत आहेत.

दुसरीकडे, उन्हाच्या या तडाख्यासोबतच राज्यावर अवकाळी पावसाचे सावटही गडद झाले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडवून दिली. सध्या कांदा आणि गहू काढणीचा हंगाम ऐन जोमात असताना, या पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. भारतीय हवामान विभागाने गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. मराठवाड्यात सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी पुढील दोन-तीन दिवसांत पुन्हा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे एकीकडे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे बळीराजा पिकांच्या नुकसानीमुळे हवालदिल झाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ