२०२९ ला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार; ‘पक्ष सोडणार’ या चर्चेवर राऊतांचे विरोधकांना सडेतोड उत्तर
शिवसेना (UBT) पक्षात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याच्या चर्चांना खासदार संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रवादीला (शरद पवार गट) राज्यसभेची जागा सोडल्यामुळे आदित्य ठाकरे आणि राऊत यांच्यात खडाजंगी झाल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “माझ्यात आणि आदित्य ठाकरेंमध्ये मतभेद असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, या केवळ कपोलकल्पित बातम्या आहेत.” ज्या बैठकीत वादाची चर्चा झाली, तिथे आपण उपस्थितच नव्हतो, असे स्पष्ट करत त्यांनी आपण केवळ एक ‘परखड शिवसैनिक’ असल्याचे सांगितले. “मी या पक्षासाठी रक्त आणि घाम गाळला आहे, त्यामुळे पक्ष सोडण्याचा विचार माझ्या मनाला कधी शिवलाही नाही,” अशा शब्दांत त्यांनी हितचिंतकांना टोला लगावला.
भविष्यातील राजकीय गणितांवर बोलताना राऊतांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीचे सूतोवाच केले. “उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री का नसतील? आमची प्राथमिकता पक्षाची संघटना मजबूत करणे आणि सध्याच्या सरकारविरुद्ध संघर्ष करणे ही आहे,” असे सांगत त्यांनी २०२९ ला सत्ता शिवसेनेकडे आणि नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे आणण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. नामवंत व्यक्ती आणि मंत्र्यांच्या वावरामुळेच अशा भोंदूबाबांना समाजात प्रतिष्ठा मिळते, ज्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले.




