साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांना सत्ताधारी मित्रपक्षाच्या मंत्र्यांकडून झालेल्या कथित मारहाणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “एका कॅबिनेट मंत्र्याला अशा प्रकारे मारहाण होणे हे लोकशाहीची हत्या असून, हा देश कोणाच्या मनमर्जीने नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालेल,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
या हल्ल्यामागे पोलिसांचा कोणताही दोष नसून, त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या एखाद्या ‘अदृश्य शक्ती’ने हे कृत्य करवून घेतल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगत, सुळेंनी या गुंडागर्दीविरुद्ध एकजुटीने लढण्याचे आवाहन केले आहे. सत्तेत असूनही आपल्याच सहकाऱ्यांकडून धक्काबुक्की सहन करावी लागणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.




