“महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाई हवी”; मुख्यमंत्रीांकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी.
नाशिक येथे तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरातt याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक झाल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक श्रद्धा आणि दैवी शक्तींचा आडोसा घेत महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत.
या प्रकरणाला आता राजकीय रंग चढला असून, रूपाली चाकणकर यांचा अशोक खरातसोबतचा फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेषतः त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.
या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्रात असे प्रकार घडणं अत्यंत निंदनीय आहे.संभाजीराजे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक असल्याचं सांगितलं. “महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणं गरजेचं आहे. अशा घटनांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो,” असं ते म्हणाले.
तसेच, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या रुपाली चाकणकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी त्यांनी केली. त्यांनी पुढे असंही स्पष्ट केलं की, जर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही, तर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून त्यांना पदावरून हटवावं. एकंदरीत, अशोक खरात प्रकरणामुळे केवळ कायदेशीरच नव्हे तर राजकीय आणि सामाजिक पातळीवरही मोठा वाद निर्माण झाला असून, यावर पुढील काळात आणखी घडामोडी होण्याची शक्यता आहे.




