दादरमधील शिवतीर्थ परिसरात रस्त्यावर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरील रस्त्यावर ही पट्टी आखण्यात आल्याने राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आले आहे. जैन समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, अनवाणी प्रवास करणाऱ्या जैन साधूंना उन्हामुळे तापलेल्या रस्त्याचा त्रास होऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली असून गेल्या काही वर्षांपासून अशी पद्धत सुरू आहे.
मात्र, संदीप देशपांडे यांनी या कृतीवर आक्षेप घेत सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही विशिष्ट समुदायासाठी अशा प्रकारची व्यवस्था करणे योग्य नसल्याचे म्हटले. त्यांनी दुपारी ३ वाजेपर्यंत पट्टी हटवली नाही तर त्यावर काळी पट्टी मारण्याचा इशाराही दिला. “सार्वजनिक जागांवर अशा प्रकारचे बदल करणे हा सांस्कृतिक दडपशाहीचा प्रकार आहे,” अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, परिसरातील काही रहिवाशांनी जैन मंदिर परिसरातील आवाज आणि इतर गैरसोयींबाबत नाराजी व्यक्त केल्याने हा वाद आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.




