मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विरार-वैतरणा रेल्वेमार्गावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. नारंगी फाटक परिसरात एका महिलेचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सततच्या पावसामुळे रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते आणि त्याचदरम्यान हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या दुर्घटनेचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला असून, मुंबईकडे येणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.




