महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षांतराचे आणि फोडाफोडीचे वारे वाहत असतानाच, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ज्यांना कोणाला आमदार होण्याची इच्छा आहे त्यांनी अजिबात काळजी करू नये, कारण ‘देवाभाऊंकडे’ (देवेंद्र फडणवीस) सर्वांचे समाधान करणारी एक दैवी शक्ती आहे, असे वक्तव्य गोरे यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीशी ही शक्ती खंबीरपणे उभी राहते. सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयानंतर सांगलीत आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. या निवडणुकीतील विजयानंतर नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादनही केले.
मात्र, या विजयानंतर महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आणि नाराजी उघडपणे समोर आली आहे. या निवडणुकीत फुटलेल्या १०० मतांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मंत्री जयकुमार गोरे यांनी थेट आपलेच पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा यांच्यावर निशाणा साधला आहे. “अनेक लोकांच्या ओठात एक, मनात एक आणि करणीत वेगळेच असते; ते महायुतीसोबत प्रामाणिक राहिले की नाही हे आता देवालाच ठाऊक,” अशा शब्दांत त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच आम्ही हिशोबात पक्के असून, या फुटलेल्या मतांचा हिशोब योग्य वेळी नक्की पूर्ण करू, असा थेट इशाराही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला.




