अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठे बदल; पार्थ पवारांच्या उमेदवारीला दमानियांचा विरोध तर DGCA च्या कारवाईवर राऊतांची प्रतिक्रिया
आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत खलबतं सुरू असतानाच, शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. “राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (UBT) या तिन्ही पक्षांना एकत्रित बसून निर्णय घ्यावा लागेल,” असे राऊत यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीकडे एक जागा निवडून आणण्याचे पुरेसे संख्याबळ आहे. मविआतील अनेक ज्येष्ठ नेते निवृत्त होत असले तरी, शरद पवार पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत राऊतांनी दिले आहेत. “पवारांसारखा ज्येष्ठ नेता जर इच्छा व्यक्त करत असेल, तर तिन्ही पक्ष त्यावर सकारात्मक चर्चा करतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “अजितदादा आज आपल्यात नाहीत. त्यांच्या पक्षाचे नेतृत्व आता सुनेत्रा पवार करत असून त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत.” दरम्यान, पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचालींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मुंडवा जमीन प्रकरणाचा उल्लेख करत, चौकशी सुरू असताना पार्थ पवारांना उमेदवारी देणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर राऊत यांनीही सत्ताधारी नेत्यांच्या मुलांवरील गुन्हे दडपले जात असल्याचा आरोप केला.
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनीच्या विमानांवर DGCA ने घातलेली बंदी हा रोहित पवारांच्या संघर्षाचा छोटा विजय असल्याचे राऊत यांनी नमूद केले. “अजितदादांच्या मृत्यूबद्दल काही रहस्ये दडलेली असू शकतात आणि रोहित पवार त्या दिशेने लढत आहेत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत,” असे ते म्हणाले. याच वेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचे समर्थन करत, देशाची संपत्ती काही मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी वापरली जात असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला.




