VSR कंपनीच्या विमानांमध्ये गंभीर त्रुटी; रोहित पवारांचा खळबळजनक दावा, ‘त्या’ कंपनीची उड्डाणे तातडीने रोखली
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे निघाले असताना, बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळच त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. सुरुवातीला खराब हवामानाचे कारण दिले जात असतानाच, आता या अपघातामागे काही तांत्रिक त्रुटी किंवा निष्काळजीपणा होता का, असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी बारामती विमानतळावर जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांवर काळाने घाला घातला आणि आनंदाचे रूपांतर आक्रोशात झाले.
या भीषण अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) केलेल्या विशेष ऑडिटमध्ये अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अजित पवार ज्या कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते, त्या VSR कंपनीवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. लिअरजेट ४५ (Learjet 45) या विमानांमध्ये अनेक सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाल्याचे आणि तांत्रिक त्रुटी असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे DGCA ने या कंपनीची सर्व उड्डाणे तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या ऑडिट रिपोर्टमुळे ‘दादांच्या’ सुरक्षेमध्ये मोठी तफावत होती का, या संशयाला आता पुष्टी मिळत आहे.
या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. “VSR कंपनी कोणत्याही नियमांचे (Compliances) पालन करत नाही आणि अत्यंत मनमानी पद्धतीने असुरक्षित विमाने उडवत आहे, हा मुद्दा आम्ही आधीपासूनच मांडत होतो,” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. DGCA ने आज कंपनीची विमाने ग्राऊंड करून आमच्या लढ्याला यश दिले असले, तरी हे यश नखाएवढे आहे; यामागील मोठे सत्य अद्याप समोर यायचे आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अजित पवारांच्या अपघाताचे काही व्हिडिओ समोर आले असून, या अपघाताचा सखोल तपास करण्याची मागणी जोर धरत आहे. एका बाजूला लाडक्या नेत्याच्या जाण्याने जनता हवालदिल झाली असताना, दुसरीकडे विमान कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा घातपात तर नव्हता ना? असा सवाल आता विचारला जात आहे.




