कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले (Nirmala Navale) यांचा पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. सोशल मीडियावर फेमस असणाऱ्या निर्मला नवले यांच्या पराभवाची आता सर्वत्र चर्चा होऊ होत आहे. आता या सगळ्यावर स्वत: निर्मला नवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. शिवाय पराभवाबाबत मनातील खदखद बाहेर काढली आहे.
पराभवावर प्रतिक्रिया देताना निर्मला नवले म्हणाल्या की, “माझा ३०० मतांनी झालेला पराभव माझ्यासाठी अनपेक्षित होता. निवडणुकीत पैशांचा अतिवापर होऊन देखील, ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्या संगळ्यांची मी अत्यंत ऋणी आहे. या निवडणुकीत पैसा जिंकला. बोगस मतदार जिंकले आणि माणूस हरला, हे कटू पण वास्तव सत्य आहे. माझ्या गणातील काही मतदार पैशांसाठी पुढील पाच वर्षांसाठी विकला गेला. ही भावना माझ्यासाठी खूप वेदनादायी आहे. या निवडणुकीत विरोधकांकडून दारुसोबत ड्रग्जचाही मोठ्या प्रमाणात वापर केला.”
“निवडणुकीत तरुण कार्यकर्ते अधिक कार्यरत राहावेत, रात्रभर जागे राहावेत, यासाठी ड्रग्जचा अतिवापर करण्यात आला. याचा गंभीर परिणाम येत्या काळात दिसून येणार आहे. ३०-४० तरुण ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. तरुण पिढी अशी बरबाद होणं, माझ्यासाठी चिंताजनक आहे. आजच्या राजकारणात विकासकामं, लोकांची सुख दु:ख, वैयक्तिक प्रश्न, पक्षनिष्ठा, व्यक्तीनिष्ठा याला कोणतीही किंमत उरलेली नाही” असंही नवले म्हणाल्या.
“दुर्दैवाने आज कोणता उमेदवार जास्त पैसा वाटतो, हेच निकष ठरले आहेत. त्यामुळे आजची परिस्थिती अशी झाली आहे की, ज्याला राजकारण करायचं आहे, त्याने आधी पैसा कमवावा, निवडणुकीत तो वापरावा, जिंकून यावं आणि नंतर पुढील पाच वर्षे जनतेकडं पाठ फिरवावी. ज्याला राजकारण करायचं नाही, त्यांनी कुटुंबाकडं लक्ष द्यावं, घर बघावं, कुटुंबाला वेळ द्यावा,” असा सल्लाही नवले यांनी दिला.




