महापालिका निवडणुकांसाठी एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे राजकीय पक्षातील अंतर्गत विरोध आणि पक्षातील बंडखोरी हि उच्च पदस्थ नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. अशातच या बंडखोरांवर मुंबई भाजपकडून (BJP) मोठी कारवाई (BJP Suspends Action) करण्यात आली आहे. भाजपने बंडखोरी (Rebellion) करणाऱ्यांचं थेट निलंबन करत कारवाईचा बडगा उगारला आहे.
मुंबई महापालिकेत अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केलेल्यांचे पक्षश्रेष्ठींकडून निलंबन करण्यात आलं आहे. मुंबई भाजपकडून जवळ जवळ 26 जणांचे 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत हि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार कारवाई झाल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये माजी नगरसेविका आसावरी पाटील, नेहल शहा, जान्हवी राणे यांचे देखील निलंबन करण्यात आलं आहे. सोबतच, दिव्या ढोले, जयमुरगन नाडार, शोभा साळगावकर यांच्यावर देखील पक्षविरोधी कारवाया केल्याने निलंबनाची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे.




