प्रसूतीवेळी घडला धक्कादायक प्रकार
अनेकदा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा जीव गेल्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे नातेवाईकांचा संताप अनावर होतो आणि मग रुग्णालयात हमरीतुमरीवर प्रकरण येतं. पंढरपुरात तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच कळसच झाला आहे. प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला चुकीचं रक्त (Blood) दिल्याने या महिलेचा प्रसूतीवेळी मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर महिलेच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील आढीव येथे राहणारी ही महिला आहे. आरती चव्हाण असं या महिलेचं नाव आहे. ती प्रसूतीसाठी रुग्णालयात आली होती. यावेळी तिला चुकीचं रक्त पुरवल्या गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर आणि रक्त संकलन केंद्राच्या गंभीर निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. आरती चव्हाण यांना प्रसुतीदरम्यान रक्ताची आवश्यकता भासल्याने कुटुंबीयांकडून रक्त आणण्यात आले होते. मात्र रक्त गट न जुळवता दिलेल्या रक्तामुळे महिलेची प्रकृती अत्यंत बिघडली. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत असून डॉ. गजानन बागल यांचे “स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर” शासनाने तत्काळ बंद केले आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने डॉक्टर आणि टेक्निशियनचे जबाब नोंदवले आहेत. या गंभीर प्रकारात अद्याप कोणाविरुद्धही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र आरतीच्या मृत्यूमुळे पंढरपूरात एकच खळबळ माजली आहे.




