3 वर्षाच्या रुद्र वाघाचा इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
भायखळा (Byculla) येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्राणीसंग्रहालयात असलेल्या शक्ती वाघाचा संशयास्पद (Mumbai Ranichi Baug) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता राणीच्या बागेतील रुद्र नावाच्या वाघाचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, शक्ती वाघाच्या मृत्यू आधी काही दिवस रुद्रचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शक्ती आणि करिष्मा यांचा रुद्र हा बछडा होता. राणीच्या बागेतच त्याचा जन्म झाला. तीन वर्षाच्या रुद्र वाघाचा इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, मात्र मृत्यूचा अहवाल प्रतीक्षेत असल्याने कारण स्पष्ट होऊ शकलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रुद्र वाघाच्या मृत्यूनंतर शक्ती वाघाचा मृत्यू झाला. मात्र या दोन्ही वाघांच्या मृत्यूचा अहवाल समोर आला नसल्याने आणि कारण समोर न आल्याने यासंबंधी माहिती जिजामाता उद्यानातील प्रशासनाकडून देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. दोन वाघांच्या मृत्यूची माहिती का दडवली गेली? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शक्ती वाघाच्या मृत्यूप्रकरणी व्याघ्र प्रेमी प्रथमेश जगताप यांनी म्हटलं की, मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून शक्ती वाघाच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. त्याचा मृत्यू संशयास्पदरित्या झालेला आहे. प्राणीसंग्रहालय प्रसासन व त्याच्यावरती उपचार करणारे पशुवैद्यकीय अधिकारी यांचा हलगर्जीपणा झाल्याने हा मृत्यू झाला आहे. शक्ती वाघाचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना प्रसिध्द न करणे, त्याची माहिती न देणे, यामागचं नेमकं काय कारण आहे, हे सर्व लपवून का ठेवण्यात आलं, त्यामागे काय कारण होतं? व्याघ्र प्रकल्पातील एका वाघाचा मृत्यू झाला तर वनविभाग त्याची बातमी दुसऱ्या दिवशी जाहीर करते पण वाघाचा मृत्यू झाल्यानंतर आठ दिवस उलटूनही याची बातमी जाहीर न करणे, यामागचं कारण काय आहे, या वाघाचा मृत्यू माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या श्वसननलिकेजवळ एक हाड अडकून त्याचा मृत्यू झाला आहे. पण त्याच्यावरती उपचार का गेले नाहीत? त्याचा मृत्यू झाला ही गोष्ट लपवून ठेवण्यामागचं कारण काय आहे, याच्यामध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर त्याचा शवविच्छेदन अहवाल येण्याआधीच त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली,याचं काय कारण आहे, असा सवालही व्याघ्र प्रेमी प्रथमेश जगताप यांनी उपस्थित केला आहे.




