आरबीआयचा मोठा खुलासा; SBI, HDFC आणि ICICI या बँकांना ‘सिस्टिमिकली इम्पॉर्टंट’ दर्जा
भारतात बँकांची संख्या मोठी असली तरी प्रत्येक ग्राहकाच्या मनात एक प्रश्न कायम असतो — आपले पैसे खरोखर सुरक्षित आहेत का? या चिंतेला आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने देशातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या तीन बँकांची निवड जाहीर केली आहे. या बँकांमध्ये तुमचा पैसा असल्यास कोणत्याही परिस्थितीत त्याला धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आरबीआयच्या यादीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक आणि ICICI बँक या तीन बँका देशातील “डोमेस्टिक सिस्टिमिकली इम्पॉर्टंट बँक्स” (D-SIBs) म्हणून घोषित झाल्या आहेत. म्हणजेच या बँका इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्यांच्यावर कोणतेही संकट आले तरी सरकार आणि आरबीआय त्यांना वाचवण्यासाठी तत्काळ पावले उचलतील. कारण या बँका ढासळल्यास संपूर्ण अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
विशेष म्हणजे अनेकांना वाटते की फक्त सरकारी बँकाच सुरक्षित असतात, पण या यादीत तीन पैकी दोन बँका खाजगी क्षेत्रातील आहेत. या तिन्ही बँका देशाच्या जीडीपी, शेअर बाजार आणि आर्थिक स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे या बँकांच्या कामकाजात धोका निर्माण झाला तर त्याचा थेट परिणाम सामान्य लोकांवर होऊ शकतो.
आरबीआयच्या नियमांनुसार या तिन्ही बँकांना इतर बँकांच्या तुलनेत अधिक भांडवल राखीव ठेवणे बंधनकारक आहे. यालाच ‘कॉमन इक्विटी टियर-1’ (CET-1) म्हणतात. हा अतिरिक्त निधी संकटाच्या वेळी बँकांना आधार देतो आणि ग्राहकांच्या पैशांचे संरक्षण करतो. म्हणूनच, तुम्ही SBI, HDFC किंवा ICICI या बँकांमध्ये खाते ठेवत असाल, तर तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित मानला जातो.




