भारतीय संस्कृतीच्या नव्या अध्यायाचे प्रतीक ठरलेला धर्मध्वज संपूर्ण राष्ट्रात आनंदाचा माहोल
अयोध्येत आज ऐतिहासिक क्षण साक्षीला आला. राम मंदिराच्या शिखरावर रामध्वजाचे विधिवत आरोहण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत तसेच अनेक साधुसंतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सणासुदीचे वातावरण निर्माण करणारी फुलांची देखणी सजावट रामनगरीत सर्वत्र पाहायला मिळाली. उंच शिखरावर फडकणारा हा ध्वज लांबूनही दृष्टीस पडत असून भक्तांच्या श्रद्धेचे नवे प्रतिक ठरला आहे.
या प्रसंगी पंतप्रधान मोदी भक्तीभावात न्हाऊन निघत बोलताना म्हणाले की, “आज संपूर्ण भारतच नव्हे तर संपूर्ण जग राममय झाले आहे. शतके सहन केलेल्या वेदनांना आता उपचार मिळत आहेत आणि संघर्षमय स्वप्न सत्यात उतरत आहे.” त्यांनी राम मंदिर स्थापनेसाठी झालेल्या दीर्घ संघर्षाची आठवण करून दिली.
मोदी म्हणाले, “हा केवळ ध्वज नाही, तर भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचे प्रतिक आहे. सूर्यवंशाची परंपरा, रामराज्याचे आदर्श आणि समाजातील सत्कार्यांची प्रेरणा या ध्वजातून प्रतिबिंबित होत आहे.”
ध्वज सत्य, धर्म आणि कर्तव्य यांचे संदेश देत राहील, असे ते पुढे म्हणाले. “सत्याचा विजय निश्चित आहे. कर्मशील आणि लोककल्याणकारी समाज उभा करण्यासाठी हा धर्मध्वज प्रेरणा देत राहील,” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ज्यांना मंदिरात प्रत्यक्ष येणे शक्य नाही, त्यांनाही या ध्वजातून रामलल्लाचे दर्शन व्हावे, अशी कल्पना या ध्वजात समाविष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. राम मंदिराच्या निर्मितीत भूमिका बजावणाऱ्या प्रत्येक दानवीर, कामगार, अभियंता आणि वास्तुकारांचे त्यांनी मनापासून आभार मानले. रामाच्या आदर्शांचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “अयोध्येने जगाला दाखवले की संस्कारांनी घडलेला एक सामान्य व्यक्ती समाजाच्या विश्वासाने मर्यादा पुरुषोत्तम बनतो.”




