नुकसान भरपाई न मिळल्यास शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा आणि कोकण भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भातील अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके-जसे सोयाबीन, कापूस, मका आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. यात हजारो हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले.खरीप हंगामात कर्जबाजारी होत शेतकऱ्यांनी नगदी पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी केली. पावसाने साथ दिल्याने पीकही बहरले. शेंगा लागल्यानंतर अळींनी आक्रमण केले. यातून मार्ग काढत पीक वाचविले. सोंगणी सुरू केली. अनेक ठिकाणी पीक सोंगून ठेवण्यात आले. यापूर्वीच मुसळधार पावसाचा तडाखा बसला. शेतात पाणी साचल्याने रचून ठेवलेल्या सूड्या पाण्याखाली गेल्या.शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, पावसामुळे जनावरांचा चारा वाहून गेला, घरांमध्ये पाणी शिरले, रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली आणि गावोगाव वीजपुरवठा खंडित झाला.
नांदेड (Nanded) जिल्ह्यातील हदगांव तालुक्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. मागील पाच महिन्यांपासून मुसळधार पावसाने संपूर्ण हदगांव तालुक्यामध्ये धुमाकूळ घातल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबरोबर काल झालेल्या परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहेत. शासनाने शेतकऱ्याला पॅकेज जाहीर केले. पण अद्याप शेतकऱ्याला पैसे मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळात आहे. अनेक शेतकऱ्यांनी उपोषण करण्याचा इशाराही यावेळी सरकारला दिला आहे.




