भारतीय सर्वेक्षण संस्थेची मान्यता; स्थानिक संस्कृतीचा सन्मान करणारा निर्णय
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव आता अधिकृतपणे ‘ईश्वरपूर (Ishwarpur)’ असं बदलण्यात आलं आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या पत्रानुसार आणि भारतीय सर्वेक्षण संस्थेच्या मान्यतेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. इस्लामपूर नगर परिषदेने 4 जून 2025 रोजी नाव बदलण्याचा ठराव मंजूर केला होता, ज्याला सांगलीच्या वरिष्ठ पोस्ट ऑफिस अधीक्षक आणि मध्य रेल्वेच्या मिरज विभागीय अभियंत्यांनी ना-हरकत प्रमाणपत्र देऊन पाठिंबा दिला. हा बदल सांगलीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानला जात आहे. स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की, हा निर्णय प्रादेशिक संस्कृती आणि परंपरांचा आदर करणारा आहे.
भारतीय सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक सर्वेक्षक तुषार वैश यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहून लवकरच राजपत्र अधिसूचना जारी करण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात गृह मंत्रालय, भारतीय सर्वेक्षण महासंचालक कार्यालय, जयपूर आणि पुणे संचालनालयालाही माहिती पाठवण्यात आली आहे.मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सोशल मीडियावर याबाबत उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले, “इस्लामपूर आता ईश्वरपूर झालं आहे. स्थानिक पातळीवरील जनआंदोलन आणि मोर्च्यांमुळे हा बदल शक्य झाला. मी स्वतः एक हिंदू म्हणून या मोर्च्यात सहभागी होतो. हा निर्णय फक्त नाव बदलापुरता नाही, तर हिंदू संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आहे.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले.हा निर्णय सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे, असं स्थानिकांचं मत आहे. ‘ईश्वरपूर’ हे नाव आता या शहराला नवी ओळख देईल आणि सांस्कृतिक वारसा जोपासण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल.




