पश्चिम बंगालमधील 293 विधानसभा जागांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातील फालता मतदारसंघात 21 मे रोजी पुनर्मतदान होणार असल्याने सध्या 292 जागांचे कल समोर येत आहेत. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात अतिशय चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे.प्रारंभीच्या आकडेवारीनुसार भाजपने 139 जागांवर आघाडी घेतली आहे, तर तृणमूल काँग्रेस 103 जागांवर पुढे आहे. त्यामुळे सत्तेसाठी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार संघर्ष सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते भवानीपूर मतदारसंघाने. येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे प्रमुख नेते सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट सामना होत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत, तर सुवेंदू अधिकारी पिछाडीवर दिसत आहेत. ममता बॅनर्जी गेल्या 15 वर्षांपासून राज्याच्या सत्तेत आहेत आणि त्यांनी यापूर्वी डाव्या पक्षांची 25 वर्षांची सत्ता संपवली होती. मात्र यंदा भाजपने त्यांना जोरदार आव्हान दिल्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे.
दरम्यान, भवानीपूरमधील परिस्थिती लक्षात घेऊन सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राममधूनही उमेदवारी दिली होती आणि त्या मतदारसंघात ते आघाडीवर आहेत. त्यांनी निकालाबाबत प्रतिक्रिया देताना अंतिम चित्र स्पष्ट होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे मत व्यक्त केले आहे.




