महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने आज संपूर्ण राज्यात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी 108 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर झाली होती. हा लढा केवळ भाषिक राज्यासाठी नव्हता, तर मराठी माणसाच्या अस्मिता, स्वाभिमान आणि ओळख जपण्यासाठीचा होता. त्या ऐतिहासिक संघर्षाची आठवण ठेवत आज विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानी मुंबई येथील हुतात्मा चौक येथे मुख्य राज्यस्तरीय सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केले. राज्याच्या निर्मितीसाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांना त्यांनी आदरांजली वाहत नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
या कार्यक्रमाला महापौर रितू तावडे, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी हुतात्म्यांच्या स्मृतींना नमन करत त्यांच्या योगदानाची आठवण जागवली. कार्यक्रमात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. स्वातंत्र्यानंतर देशभरात भाषिक राज्यांच्या पुनर्रचनेची चळवळ उभी राहिली होती. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठीही तीव्र आंदोलन झाले आणि अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या बलिदानातूनच स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती शक्य झाली.
आजचा दिवस केवळ आनंद साजरा करण्याचा नसून, त्या संघर्षाची जाणीव ठेवण्याचा आहे. औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्राने मोठी झेप घेतली असून देशाच्या प्रगतीत राज्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. “दिल्लीचं तख्त राखणारा महाराष्ट्र” ही ओळख आजही अभिमानाने टिकून आहे.




