अजित डोवाल आणि ‘रॉ’ प्रमुखांसोबत गुप्त बैठक; तारिक रहमान सरकारचे शांततेसाठी पाऊल
शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर भारत आणि बांग्लादेशातील संबंधांत आलेली कटुता आता निवळताना दिसत आहे. या दोन देशांमधील दरीचा फायदा घेऊन भारताविरुद्ध कट रचणाऱ्या पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये बांग्लादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर, बांग्लादेशच्या DGFI चे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद कैसर राशिद चौधरी यांनी नुकताच दिल्लीचा एक अत्यंत गोपनीय दौरा केला, जो दक्षिण आशियाई राजकारणात मैलाचा दगड मानला जात आहे.
अधिकृतपणे ‘मेडिकल व्हिजिट’ म्हणून नोंदवलेल्या या दौऱ्यात जनरल चौधरी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, ‘रॉ’ (RAW) प्रमुख पराग जैन आणि लष्करी गुप्तचर संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल आर.एस. रमन यांची भेट घेतली. या ‘सीक्रेट’ बैठकीत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे; तो म्हणजे, “कुठल्याही परिस्थितीत आपल्या भूमीचा वापर दुसऱ्या देशाच्या विरोधात (विशेषतः भारताविरुद्ध) होऊ द्यायचा नाही.” ऑगस्ट २०२४ च्या राजकीय भूकंपानंतर दोन्ही देशांतील संवाद खुंटला होता, मात्र या दौऱ्याने तो पुन्हा रुळावर आणण्यासाठी भक्कम पाया रचला आहे.
भारतासाठी हा दौरा सुरक्षा दृष्टिकोनातून अत्यंत कळीचा आहे. जर बांग्लादेशसोबतचे संबंध बिघडले, तर ईशान्येकडील राज्यांमधील (Northeast India) शांतता धोक्यात येऊ शकते, याची जाणीव दिल्लीला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने बांग्लादेशला आपल्या बाजूने वळवण्याचे केलेले प्रयत्न आता अपयशी ठरताना दिसत आहेत. ढाक्यातील नवीन सरकारने भारतासोबत सहकार्याचा हात पुढे केल्याने दक्षिण आशियातील शक्ती संतुलन पुन्हा एकदा भारताच्या बाजूने झुकले आहे.




