आखाती युद्धाचा अप्रत्यक्ष फटका; मेनूमधील पदार्थ कमी, कामगारही मिळणे कठीण.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा परिणाम आता सातारा जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायावरही दिसू लागला आहे. व्यावसायिकांना नियमित गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेलमध्ये चुली आणि कोळशाच्या शेगड्यांवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.
गॅस शेगडीवर स्वयंपाक करणे सोपे असते, मात्र चुलीवर स्वयंपाक करणे अधिक वेळखाऊ आणि कष्टाचे असल्याने कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायासाठी आवश्यक असलेले कामगार मिळवणेही कठीण होत असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.
याशिवाय, गॅसच्या अभावामुळे हॉटेलमधील पदार्थांची विविधताही कमी झाली आहे. पूर्वी एका हॉटेलमध्ये सुमारे 30 ते 35 प्रकारचे पदार्थ उपलब्ध असायचे, परंतु सध्या परिस्थितीमुळे केवळ 6 ते 7 पदार्थांवरच मेनू मर्यादित ठेवावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांची संख्या घटत असल्याचेही हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने लक्ष घालून हॉटेल व्यवसायासाठी दररोज किमान एक व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.




