उपांत्य फेरीच्या आकडेवारीने वाढवली धाकधूक; ८ मार्चला रंगणार विश्वचषकाचा अंतिम थरार
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या जेतेपदाकडे लक्ष ठेवून असलेला भारतीय संघ आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासमोर उपांत्य फेरीत बलाढ्य इंग्लंडचे आव्हान असणार आहे. हा ऐतिहासिक सामना ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल, तर या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संपन्न होणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास पारडे कोणाचे जड आहे, याची प्रचिती येते.
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत टी-२० विश्वचषकात ५ वेळा आमने-सामने लढत झाली आहे. यामध्ये भारताने ३ वेळा तर इंग्लंडने २ वेळा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, उपांत्य फेरीच्या इतिहासात या दोन संघात ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली आहे. २०२२ च्या विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताला १० गडी राखून पराभूत केले होते, तर २०२४ च्या उपांत्य फेरीत भारताने ६८ धावांनी विजय मिळवत त्या पराभवाचा बदला घेतला होता. आंतरराष्ट्रीय टी-२० च्या एकूण २९ सामन्यांपैकी भारताने १७ वेळा बाजी मारली आहे, तर इंग्लंडला १२ वेळा विजय मिळवता आला आहे.
२०२६ च्या या विश्वचषकात दोन्ही संघांचा प्रवास आतापर्यंत सारखाच राहिला आहे. ७ पैकी ६ सामने जिंकून दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. भारताचा संघ अष्टपैलू खेळाडूंच्या जोरावर भक्कम दिसत असला, तरी इंग्लंडची आक्रमक फलंदाजी चिंतेचा विषय ठरू शकते. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांसारख्या मॅच विनर्सचा समावेश आहे. वानखेडेच्या घरच्या मैदानावर भारतीय संघ इंग्लंडला धूळ चारून फायनलमध्ये धडक मारणार का, याकडे अवघ्या जगाचे डोळे लागले आहेत.




