उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट; हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने दिले भारतीय संघाला खुले आव्हान
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी १ मार्च २०२६ हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये विजयाचा अश्वमेध सुरूच ठेवत वेस्ट इंडिजवर ५ गडी राखून मात केली. सुपर-८ फेरीतील या अंतिम आणि ‘करो या मरो’च्या लढतीत भारताने १९६ धावांचे कठीण लक्ष्य अवघ्या १९.२ षटकांत पूर्ण केले. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे संजू सॅमसन. संजूने ५० चेंडूंत ९७ धावांची नाबाद खेळी साकारून भारताला उपांत्य फेरीचे तिकीट मिळवून दिले. त्याच्या या धडाकेबाज कामगिरीसाठी त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयामुळे वेस्ट इंडिजचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून भारताने उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
भारताचा विजय निश्चित होताच स्पर्धेतील उपांत्य फेरीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघांनी आधीच आपली जागा निश्चित केली होती. आता ५ मार्च रोजी मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्याचे महत्त्व ओळखून इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकचा फोटो असून त्यावर ‘Confirmed’ असे लिहिले आहे. आपण उपांत्य फेरीत भारताशी भिडण्यासाठी सज्ज आहोत, असे संकेत इंग्लंडने या पोस्टद्वारे दिले आहेत.
पहिल्या उपांत्य सामन्यात ४ मार्च रोजी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड एकमेकांसमोर उभे ठाकतील. मात्र, भारतीय चाहत्यांच्या नजरा ५ मार्चच्या लढतीकडे लागल्या आहेत, कारण सूर्यकुमारची सेना आणि हॅरी ब्रूकची पलटण मुंबईच्या मैदानात आमनेसामने येणार आहेत. मायदेशातील प्रेक्षकांचा पाठिंबा आणि संजू सॅमसनचा फॉर्म पाहता टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या इंग्लंडच्या आव्हानात्मक पोस्टची आणि भारताच्या विजयाची जोरदार चर्चा रंगली आहे.




