८५ टक्के काम पूर्ण; नवीन कॉरिडॉरमुळे मुंबई–कर्जत प्रवास होणार अधिक जलद.
मुंबई महानगरातील लोकल सेवा ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. याच पार्श्वभूमीवर बहुप्रतीक्षित पनवेल–कर्जत रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण प्रगतीची माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार या मार्गाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
सुमारे २९.६ किलोमीटर लांबीच्या या दुहेरी मार्गातील जवळपास ७० टक्के ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे. पनवेल ते कर्जतदरम्यान दोन रेल्वे फ्लायओव्हर उभारण्यात आले असून ते पूर्णत्वास गेले आहेत. तसेच तीन बोगद्यांची उभारणी करण्यात आली आहे. एकत्रित ३.२ किलोमीटर लांबीच्या या बोगद्यांसाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे २,७८२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या कॉरिडॉरवर ५ रोड ओव्हर ब्रिज आणि १५ रोड अंडर ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सुरुवातीला पनवेल, चिखले, पोएंजे, चौक आणि कर्जत अशी स्थानके या मार्गावर असतील. स्थानकांची उभारणीही वेगाने सुरू आहे.
हा मार्ग सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वे अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत (कल्याणमार्गे) या विद्यमान मार्गावरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. पनवेल स्थानकावरून एस्केलेटरच्या माध्यमातून थेट कर्जत लाईनला जोडणी मिळणार आहे. सध्या रस्त्याने कर्जतपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे दीड तास लागतो; मात्र नवीन रेल्वेमुळे हा प्रवास अवघ्या ४० मिनिटांत पूर्ण होईल. विशेषतः नवी मुंबई आणि पनवेल परिसरात कामासाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे.




