मी जिला गंगा मानलं, तिचा दक्षिण भारतात सौदा झाला”; कुंभमेळ्यातील ‘व्हायरल गर्ल’च्या विवाहावरून नवा वाद
महाकुंभमेळ्यातील एका फोटोमुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आलेली ‘व्हायरल गर्ल’ मोनालिसा भोसले हिने तिचा प्रियकर फरमान खान याच्याशी केरळमध्ये विवाह केला आहे. मात्र, या आंतरधर्मीय विवाहाने आता एका मोठ्या वादाला तोंड फोडले आहे. ज्या दिग्दर्शकाने मोनालिसाला अभिनेत्री बनवण्याची घोषणा केली होती, त्या सनोज मिश्रा यांनी या लग्नाला ‘बंडखोरी’ न म्हणता थेट ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे आपण प्रचंड नैराश्यात (डिप्रेशनमध्ये) असल्याचे सांगत मिश्रा यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे.
सनोज मिश्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये मोनालिसाच्या संघर्षाचा उल्लेख करताना गंभीर आरोप केले आहेत. “मी जिला गंगेसारखी पवित्र मानले आणि जिच्या संघर्षात तिला साथ दिली, तिचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला,” असे त्यांनी म्हटले आहे. मोनालिसाच्या मॅनेजरवर निशाणा साधत मिश्रा यांनी आरोप केला की, ज्या शिक्षकाला त्यांनी मोनालिसाला प्रशिक्षण देण्यासाठी नेमले होते, तोच ‘दलाल’ बनला आणि त्याने दक्षिण भारतात तिचा सौदा केला. वसीम रिझवींसारख्या विरोधकांनी आपल्याला खोट्या आरोपात तुरुंगात पाठवून महाकुंभमेळ्याच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न केला, असा दावाही त्यांनी केला आहे.
मोनालिसाच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर भाष्य करताना मिश्रा म्हणाले की, तिचे वडील आणि नातेवाईक ढोंगी होते आणि तिचे आयुष्य अत्यंत कठीण होते. सेलिब्रिटी झाल्यानंतरही तिची आई भिकाऱ्यासारखी माळा विकताना पाहून ती रडायची. आता तिने फरमान खानशी केलेले लग्न हे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असून ती लव्ह जिहादची बळी ठरली आहे, असे खळबळजनक मत मिश्रा यांनी व्यक्त केले आहे. पोलिसांच्या संरक्षणात पार पडलेल्या या विवाहाने आता चित्रपटसृष्टी आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आणले आहे.




