बारामतीत भीषण विमान दुर्घटना: उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर देशभरात शोककळा पसरली असून, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) कडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मुंबईहून उड्डाण केलेले हे खासगी विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना रनवेच्या थ्रेशोल्डच्या अगदी जवळ कोसळले. अपघात होताच विमानाने पेट घेतला आणि काही क्षणांतच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण विमान वेढले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडकेनंतर सलग चार ते पाच स्फोट झाले, ज्यामुळे परिसरात मोठा गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात विमानाचे नियंत्रण सुटले. याच दरम्यान कॉकपिटमधील संभाषणात क्रूचे शेवटचे शब्द “Oh Sh*t…” ऐकू आल्याचेही समोर आले आहे. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24 च्या डेटानुसार, विमानाचा दुसरा लँडिंग अॅप्रोच अपयशी ठरला होता.
या विमानात कॅप्टन सुमित कपूर, को-पायलट सांभवी पाठक, सुरक्षा अधिकारी विदिप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे क्रू मेंबर्स उपस्थित होते. सर्वांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते. त्यांच्या अकाली जाण्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
DGCA कडून हवामान स्थिती, रनवेची परिस्थिती, पायलटचा निर्णय आणि तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास केला जात असून, या भीषण दुर्घटनेमागील नेमके कारण लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.




