नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेत त्याच्या पोलीस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे. या निर्णयामुळे तपास यंत्रणांना अधिक वेळ मिळाला असून प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने पुढे जाणार आहे.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने गंभीर आरोप मांडत खरातवर पाच नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला. तसेच, तपास करणाऱ्या एसआयटीच्या हाती काही पेनड्राईव्ह आणि महत्त्वाचा डिजिटल डेटा लागला असल्याची माहिती देण्यात आली, ज्यामुळे या प्रकरणाचे स्वरूप आणखी मोठे आणि गुंतागुंतीचे असल्याचे स्पष्ट होत आहे.
याशिवाय, खरातवर वन्यजीवांची शिकार केल्याचा, विशेषतः हरणाशी संबंधित प्रकरणाचा संशय असून काही लोकांना कस्तुरी दिल्याचेही आरोप समोर आले आहेत. तसेच, लैंगिक अत्याचाराशी संबंधित डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात नमूद केले.
दरम्यान, आरोपीच्या बाजूने तपास जवळपास पूर्ण झाल्याचा दावा करत कोठडीची गरज नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने तपासासाठी पाच दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मंजूर केली आहे.




