शुबमन गिलकडे नेतृत्व, तर रोहित-विराटचा अनुभव मदतीला; विश्वचषक जिंकण्यासाठी मास्टर प्लॅन सज्ज
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने २० मुख्य खेळाडूंच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. या यादीतूनच कामगिरीच्या जोरावर अंतिम १५ खेळाडूंची निवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल राखण्यात आला आहे. कर्णधारपदाची धुरा शुबमन गिल याच्याकडे असेल, तर श्रेयस अय्यर उपकर्णधाराची भूमिका बजावू शकतो. भारतीय चाहत्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे दिग्गज त्रिकुट या मोहिमेचा अविभाज्य भाग असणार आहेत.
संघातील इतर स्थानांसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वाल आणि अभिषेक शर्मा यांचे नाव शर्यतीत असून, अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यावर जबाबदारी असेल. गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांच्या सोबतीला हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी दिली जाऊ शकते. मात्र, सर्वात मोठी ओढाताण विकेटकीपिंग विभागासाठी आहे; जिथे ऋषभ पंत, इशान किशन आणि संजू सॅमसन या तिघांमध्ये अंतिम जागेसाठी कडवी झुंज होणार आहे. आयपीएल २०२६ आणि त्यानंतरच्या अफगाणिस्तान, इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी या २० खेळाडूंचे भविष्य ठरवणारी ठरेल.




