उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघाताचे नेमके स्वरूप काय, हा अपघात होता की घातपात, यावरून आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मागील दोन दिवसांपासून रोहित पवार दिल्लीत तळ ठोकून असून त्यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. या प्रकरणातील तांत्रिक तफावत आणि तपासातील विसंगती त्यांनी पुराव्यांसह मांडल्याने खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, अजितदादांचे पुत्र जय पवार आता या लढाईत सक्रिय झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर ‘व्हीएसआर’ कंपनीच्या मालकाचा विमान चालवतानाचा एक आक्षेपार्ह फोटो शेअर करत सुरक्षेच्या गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले होते. “ही एका मुलाची आर्त हाक आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या वडिलांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सोमवारी, ९ मार्च रोजी जय पवार एक विशेष पत्रकार परिषद घेणार असून, त्यात ते ‘व्हीएसआर’ कंपनीबाबत कोणते नवे खुलासे करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण घडामोडींदरम्यान रोहित पवार यांनी अजितदादांच्या निकटवर्तीय नेत्यांनाही लक्ष्य केले आहे. “जर तुम्ही खरोखरच अजितदादा प्रेमी असाल, तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आणि गुन्हा नोंदवण्यासाठी दबाव का आणत नाही?” असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. रोहित पवारांचे दिल्लीतील सादरीकरण आणि जय पवारांची आक्रमक भूमिका यामुळे हे प्रकरण आता कायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या कोणत्या वळणावर जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




