व्हीएसआर कंपनीच्या मालकाला ‘व्हीआयपी’ ट्रिटमेंट; एफआयआरवरून सरकार आणि यंत्रणांना घेरले
आमदार रोहित पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून राज्य सरकार आणि तपास यंत्रणांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा निव्वळ अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवत, रोहित पवारांनी विचारलेल्या रोखठोक प्रश्नांमुळे तपास यंत्रणांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत आहे. तपास यंत्रणांकडून होणारा थातूरमातूर तपास पुराव्यानिशी समोर आणल्याने आता सीआयडी आणि इतर यंत्रणा दबावात आल्या आहेत. विशेषतः व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांना सीआयडी कार्यालयात मिळालेल्या वागणुकीवर पवारांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सिंग हे चौकशीसाठी आले होते की पाहुणचारासाठी, असा सवाल करत रोहित पवारांनी आरोप केला की, त्यांना कार्यालयात नाश्ता, जेवण आणि चक्क क्रिकेट मॅच पाहण्याची सुविधाही पुरवण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, मीडियाची नजर चुकवण्यासाठी त्यांना पोलिसांच्याच काळ्या काचांच्या गाडीतून बाहेर नेण्यात आले, यावरून पवारांनी संताप व्यक्त केला आहे.
रोहित पवार यांनी या प्रकरणातील ‘एफआयआर’च्या मुद्द्यावरूनही सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. २०१९ च्या घाटकोपर विमान अपघातात तातडीने एफआयआर नोंदवला गेला, मग अजित पवारांच्या बाबतीत तसाच गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्तेत असूनही जर तुम्ही अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी एक एफआयआर दाखल करू शकत नसाल, तर तुमच्या ताकदीचा काय उपयोग, असा बोचरा वार त्यांनी सत्ताधारी गटावर केला. आज संध्याकाळी रोहित पवार स्वतः नवीन कागदपत्रे घेऊन सीआयडी कार्यालयात जाणार असून, ‘एएआयबी’चा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याच्या आश्वासनाचे काय झाले, याची जाब विचारणार आहेत. या संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता हवी आणि तपासाची दिशा योग्य असावी, अशी आग्रही मागणी पवारांनी केली आहे.




